वैजनाथ परळी

वैजनाथ


वैद्यनाथ म्हणजेच परळीचा वैजनाथ होय. हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी कुष्ट रोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते.

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥, 


अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. या श्लोकात बारा ज्योतिर्लिंगाची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे असणाऱ्या ज्योतिर्लिंगाबाबत वाद आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकीचे पाचवे  ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथील नसून उत्तर भारतातील असावे असा दावा करण्यात येतो. मात्र, या वादावर आता पडण्याची शक्यता आहे. 


वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे. त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.संकेश्वर पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील जयदेव आश्रम स्वामी महाराज, स्वामी मधुरानंदजी आदी संत-महंत परळी शहरात धर्मसभेसाठी आले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ दर्शन घेतले. त्याशिवाय नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन अध्यात्मिक मार्गदर्शन व हितगुज केले. 


हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. देशभरात बारा ठिकाणे आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांमध्येही ज्योतिर्लिंग आहेत. परळी-वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या दाव्यावरून मतभिन्नता आहे. वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग हे हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथील असल्याचाही दावा करण्यात येतो. 


या दावे-प्रतिदाव्याच्या पार्श्वभूमीवर  संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी वैजनाथ येथील शिव मंदिर हेच ज्योतिर्लिंग असल्याचे वक्तव्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. 

परळी वैजनाथभारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. लोकसंख्या ३१,०७८ (१९७१). वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केला (१७८३), असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप १९०४ मध्ये रामराव देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते.

परळी हे रेल्वे प्रस्थानक असून रुंदमापी व मीटरमापी असे दोन्ही लोहमार्ग येथे आहेत. शहरातील बाजारपेठ बरीच मोठी असून धान्यव्यापाराचे हे एक केंद्र समजले जाते. येथे वैद्यनाथ महाविद्यालय व ६० मेवॉ. क्षमतेचे मोठे औष्णिक वीज केंद्र आहे.

येथे पाऊस मध्यम स्वरूपाचा पडतो. पिवळी ज्वारी, भुईमूग, कापूस ही पिके प्रामुख्याने घेतली जात असून अलीकडे उसाचेही उत्पादन केले जाते.

कथा

एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो. महादेव रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात. तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग रुपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो. महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात. परंतु महादेव रावणाला सांगतात की, ‘हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील.”

रावणाने महादेवाचे म्हणणे मान्य केले. परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला त्याचा भार झेपेना. तेव्हा महादेवाने त्या लिंगाला दोन रूपांमध्ये विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले. रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघवी लागली. शिवलिंग खांद्यावर घेऊन लघवी कशी करणार या विचारात रावण पडला, तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला.
रावणाने त्या गवळ्याला कावड थोडावेळ जमिनीला न टेकवता घेऊन उभे राहा असे सांगितले. परंतु गवळ्याला कावडीचे वजन न झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथेच स्थापन झाले.

रावण परत आल्यानंतर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला तेही शिवलिंग जमिनीला चिकटले. रावण निराश होऊन लंकेला निघून गेला. यानंतर सर्व देव पहिल्या लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, ‘जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल.’ त्यानंतर देवांच वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...